मी घराचं लोटलेलं दार हळूच ढकललं, पंतांना भेटायची ईच्छा होती, पण पंतांचा डोळा लागल्याचं माझ्या लक्षात आलं म्हणून मग आवाज न करताच निघालो तेवढ्यात पंत ओरडले आणि मी थबकलो.
हरामखोर चल चालता हो इथून ... ! निघ पाहू ...
अंथरुणात पडलेले श्यामराजपंत मोठ्यांदा ओरडले. मोठ्या लगबगीनी पण तरीही काठी टेकवत टेकवत माई बाहेर आल्या आणि श्यामराजपंतांच्या उशाशी बसून, त्यांचा हात आपल्या हातात घेत, हळुवार दाबत, विचारत्या झाल्या, "अहो ! काय होतंय ? हे घ्या थोडंस पाणी प्या."
माईंच्या या बोलण्यानी थोडसं भानावर येत श्यामराजपंतांनी माईंच्या हातातलं फुलपात्र पडल्या पडल्याच ओठांना लावलं, जेमतेम ओठ ओले केले, आणि बसं म्हणून हात केला.
मग आपल्या हातातलं फुलपात्र बाजूला ठेवून, "आता आराम करा!" म्हणत माई उठल्या, मला बसायची खूण करून आपण परत आतल्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या, एकीकडे गणपतीच्या नावाचा जप सुरूच होता. खरंतर मागच्या कित्येक वर्षांपासून माई कामाव्यतिरिक्त एकही शब्द कुणाला बोलल्या नव्हत्या. फक्त गणपतीचं नाव त्यांच्या तोंडातून येणार जाणारा प्रत्येकजण ऐकायचा. माई आत गेल्या. श्यामराजपंत परत एकदा आढ्याकडे डोळे लावून बसले, नकळत डोळ्यात पाणी आलं, छताला लावलेला फॅन आणि त्याला चिकटलेलं जाळं हळूहळू धूसर होत गेलं. मनात जपून ठेवलेली आठवणींची पानं परत एकदा फडफडली आणि श्यामराजपंत सांगू लागले,
अरे ... ! तुझ्याच वयाचा होतो, कॉलेजात शिकायचो, माझे वडील रघुनाथपंत कुलकर्णी उर्फ अण्णा म्हणजे गावातलं बड प्रस्थ. आमच्याकडे पन्नास एकर ओलीताखालची शेती होती, गावात भला थोरला वाडा होता, जवळ जवळ पाचशे चौरस फूटाची ओसरी होती, घरात कामाला गडी माणसांची वर्दळ असायची, पंचवीस म्हशी , दहा गाई आणि आठ बैल येवढं जनावर दावणीला होतं. दररोज धोंडिबा गाईच्या शेण-पाण्याचा सडा टाकायचा, मैनी त्यावर रांगोळी काढायची. वाड्यासमोरच्या अंगणात तुळशी वृंदावन होतं, अक्का सकाळी दररोज तुळशीला पाणी घालायची. मग तोंडात स्तोत्र आणि कुकरच्या शिट्टीचा आवाज घरभर घुमायचा. घरात दोन कुत्रे पाळलेले होते, त्यांच्या भुंकण्यानी, गोठ्यातून हंबरणाऱ्या गाई म्हशीच्या आवाजानी आणि शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटानी प्रत्येक पहाट गजबजून जायची.
अण्णांना गावातले सगळेजण मानायचे, कोणाच्याही अडीअडचणीला आर्ध्यारात्री सुद्धा अण्णा हजर असायचे. गरजू माणसाला मदत करण्यासाठीच जणू अण्णांचा जन्म झालेला. कोणावरही पटकन विश्वास टाकून मोकळा होणारा त्यांचा स्वभाव होता. हे माहीत असल्यानं अक्काला त्यांच्या व्यवहारातही सारखं लक्ष द्यावं लागायचं. माणूस कितीही स्वच्छ मनाचा असला तरी अजातशत्रुत्वाला एकप्रकारची लागणारी चतुराई अण्णांकडे नव्हती. एखाद्याला आपलं म्हणलं की अगदी कंबरेची लंगोट काढून देण्याइतकी त्यांची तयारी असायची. आमचे दाजी म्हणजे आमचे आजोबा निरक्षर होते त्यामुळे त्यांनी मालमत्तेची कागदपत्र पाहायची जबाबदारी त्यांचे मित्र आनंदराव देशपांडे यांच्यावर सोपवलेली होती. जेंव्हा अण्णांनी घराचा कारभार पाहायला सुरुवात केली तेंव्हाही आनंदरावांनी मालमत्तेची कागदपत्र सांभाळली नंतर दोन पिढ्यांच्या विश्वासावर मीही घरोब्याचे संबंध असेच राहावेत या हेतूनी आनंदरावांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विश्वासराव देशपांड्यांकडेच कागदपत्रांची जबाबदारी राहू दिली. एक दिवस विश्वासराव देशपांडे आले, त्यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी काही सह्या मागितल्या, अण्णा अजून काही जमीन खरेदी करणार आहेत हे माझ्या कानांवर आलेलं होतं त्यामुळे मी विश्वासरावांजवळ फारशी चौकशी न करता अण्णांकडे पाठवून दिलं. माझं लग्न झालेलं होतं आणि घरातले बरेचसे व्यवहार मी पाहात असलो तरी अंतिम निर्णय आणि सह्या या अण्णाच करत असत. शेवटी विश्वासरावांवर विश्वास ठेवून अण्णांनी कागदपत्र न वाचताच सांगितल्या ठिकाणी सह्या केल्या, आणि घात झाला !
पहाता पहाता विश्वासरावांनी आमच्या विश्वासाला तडा दिला. आणि सगळ्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या. या धक्क्यानी अण्णांनी जागीच जगाचा निरोप घेतला. विश्वास आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलेलो, एकत्र खेळलेलो त्याच्या अशा वागण्यानं मला प्रचंड राग आला आणि ...
संताप आणि चिडचिड झाली, विश्वासनी केलेल्या गोष्टीचा जाब विचारायला म्हणून मी निघालो, इतक्यात तो माझ्या दारात उभा दिसला, चडफडाट होऊन मी त्याला हरामखोर चल चालता हो इथून ! निघ पाहू ... म्हणून ओरडलो, तो माझ्याकडे पाहून हसला त्यामुळे अजून संताप संताप होऊन त्या संतापाच्या भरात मला अर्धांगवायूचा झटका आला. माझी बायको सगुणा म्हणजे तुझी माई , अक्का, धोंडिबा , मैनी माझ्याकडे धावले. पुढे उपचार सुरु झाले, अक्कांनी धोंडिबा आणि मैनीला त्यांची ईच्छा नसतांना जवळजवळ हाकलून लावलं. उरलेला वाडा, दावणीची जनावरं आणि अंगावरचे दागिने विकून अक्का आणि माईंनी आलेल्या पैशातून या मुंबापुरीत चाळीतलं दोन रूमचं घर घेतलं. चार वर्षांपूर्वी अक्कानीही जगाचा निरोप घेतला. आता काही रक्कम बँकेत जमा आहे त्याच्या व्याजावर जगत आहोत.
डोळ्याच्या कडांवरून अश्रू ओघळत होते, श्यामराजपंत डोळे पुसण्यासाठी हात डोळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करत होते पण जमत नव्हतं. प्रयत्न करूनही माणसाला आपले अश्रू आपल्या हातांनी पुसता येऊ नयेत, केवढी ही दैवाची क्रूर चेष्टा असं कुठेतरी माझ्या मनाला वाटून गेलं. शेवटी मी त्यांचे अश्रू पुसले, ते पाहून ते हसले, त्या हसण्यात असाह्यता, हतबलता होती, दुसऱ्याची नको वाटणारी मदत होती. ते हसणं त्या वेळी मला इतकं चटका लावून गेलं, वाटलं की या माणसानं अजून अश्रू ढाळले तर बरं पण त्याचं हसणं नको.
शेवटी कारच्या काचेवरचं वायफारनी दूर केलेलं पाणी क्षणभर दूर व्हावं आणि परत पावसानी समोरचं चित्र धूसर करावं तसे श्यामराजपंतांचे डोळे भरून आले. बालवाडीत नाही का वर्गमित्र किंवा दुसरे मुलं रडायला लागले की आपणही रडायचो तसेच माझेही डोळे भरून आले.
इतक्यात आतून माईंच्या काठीचा आवाज ऐकून मी माझे डोळे पुसले, पहातो तर पंतांनी सुद्धा विज्ञानाचे सगळे नियम मोडीत काढत डोळ्यातुन बाहेर पडायला अधीर असणाऱ्या सगळ्या अश्रूंना डोळ्यात बेमालूम दडवलं. माई माझ्याकडे पाहून हसल्या, थरथरत्या आवाजात बरा आहेस ना ? म्हणत बसण्याची खूण करत घराच्या बाहेरच्या कठड्याजवळ गेल्या.
मी आश्चर्यानं श्यामराजपंतांना विचारलं, डोळ्यातलं पाणी दडवलत कसं ? पंत म्हणाले, आता एवढंच काय ते करू शकतो. तिला माझ्या डोळ्यातली आसवं पाहून सुरुवातीच्या काळात आसवं ढाळताना पाहीलयं मी, आता तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये परत म्हणून एवढं करतोच. इथं मला प्रेमाचा नवा रंग उठून दिसला, शेवटी निघतो पंत म्हणत मी हळुवार त्यांचा हात हातात घेतला, पापण्यांची उघडझाप करून त्यांनी मला संमती दिली. मी बाहेर पडलो माई कठड्याजवळ उभ्या होत्याच त्यांच्या पाया पडलो आणि वर उठलो तेंव्हा , माईंच्या तोंडावर हास्य आणि डोळ्याच्या कडा ओल्या होत्या, एकही शब्द न बोलणारी माईंची चर्या बरंच काही सांगून गेली. परत एकदा निःशब्द होऊन मी तिथून निघालो .
- भार्गव हिरवे