Saturday, 30 September 2017

आणि दसरा साजरा झाला ...

चला मेगापोलीस ... लास्ट स्टॉप  ...
कर्रर्र ... ब्रेक चा आवाज झाला. पुण्यात आल्यापासून माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेली PMPL बस थांबली. सगळी बस अगदी रिकामी होती. अगदी 3-४ प्रवासी होते. एक एक उतरत होता. कन्डक्टर साहेब पैसे मोजत  होते. मी त्यांच्याजवळ जावून थांबलो होतो.



- काय झालं काही पैसे द्यायचे उरलेत का ? तिकीट दाखवा असं ते म्हणाले.
- मी नाही म्हणत हातमिळवणी करण्यासाठी  हात पुढे केला. थोडंसं आश्चर्यानी माझ्याकडे पहात त्यांनी हात मिळवला. मग मी त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तेही अगदी खुल्या मनानी हसले.
- हेच मी बस ड्रायव्हरलासुद्धा म्हटलं, त्यांनी म्हटलेलं "अरे वा !" मध्ये त्यांना झालेला आनंद दिसला.समोरून येणाऱ्या एका कारच्या उजेडात त्याचा हसरा चेहरा दिसला 
- दिवसभर गाडी चालवून थकलेले हात, दक्षपणे गाडी चालवून थकलेली नजर काही क्षण का होईना पुन्हा ताजीतवानी झाल्याचा फील घेऊन मीही बाहेर पडलो.

खरचं आपण सणासुदीला झकपक कपडे घालून बाहेर जातो सण साजरा करतो ते बऱ्याचदा या सगळ्या लोकांच्या जीवावर, ते सणाच्या दिवशीही काम करत असतात त्यामुळे आपण आपले सण आनंदानी आणि उत्साहानी साजरे करू शकतो.
तेंव्हा आजच्या दिवशी, सगळ्या कंडक्टर आणि ड्रायव्हर साहेबांसारख्या आपलं आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांना #ThankYou  आणि आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा ...

© भार्गव हिरवे 

Friday, 29 September 2017

पारावरची आठवण ...

चिऊ कोकिळा दळतील दाणी
कबुतर भरेल घरचे पाणी
आपण ऐकू गोष्टी, गाऊ गाणी

पाहुण्यांची देईल कावळा वर्दी 
पेरुनी पोपटाला झाली सर्दी
खारुताई पळाली झाडावरती
माकडांची बाजूला भाऊगर्दी

कुणी ससुला गवतावरती
कासव नव्हते अवती भोवती
चल ना दादा, जाऊन येऊ
अंगणातल्या आंब्याच्या झाडावरती

हरवली का रे गर्द सावली
चहूकडे इमारतींची वस्ती
गर्द हिरव्याशा झाडाला अजुनी
आम्र आठव फळे लगडली

- भार्गव 

Wednesday, 27 September 2017

अशांत ...

बुडता बुडता उरतील मागे शब्द माझे जशी तुकयाची गाथा त्रि - खंडात गाजे शब्दांचा हृदयातून पाझर फुटतो जेंव्हा कागदावरची शाईसुद्धा मज गंगा भासे सायंकाळी जेंव्हा खग आकाशात उडती वाटते मलाही आकाशी झेपावत जावे कधी आकृष्ट करती जेंव्हा मज पर्वतराजी मन कोसळणाऱ्या जलधारेसंगे दरीत धावे नितळ आकाशाने बघता स्वबिंब दर्यामधे त्यातही त्याला माझे आधी रूप दिसावे साश्रु नयने घेऊन जाणाऱ्या ढगांस काळ्या धरेकडे बघून आठवणीत माझ्या रडू कोसळावे मन विदीर्ण होऊन पुर्णविरामात स्थिर व्हावे एका ठिपक्याने जणू वाक्य परिपूर्ण व्हावे ©भार्गव हिरवे

Monday, 25 September 2017

कधी भरून वाहतो, कधी रिकामा असतो ...

कधी भरून वाहतो, कधी रिकामा असतो
कधी उदासवाणा, कधी स्वच्छंदी हसतो
कधी ऐकत बसतो फक्त शब्दांना मी
कधी स्वरांमध्ये मी आकंठ डुंबून जातो ...

कधी बागडणाऱ्या मुलांमध्ये भोवतीच्या
कधी विनासक्त उडणाऱ्या पाखरांच्या
कधी वाऱ्यासंगे खेळणाऱ्या नभांमध्येही
मी हरवलेले लहानपण शोधत असतो  ...

वहीवाटत असता रस्ता आयुष्याचा
मी वेचित जातो सडा इथे रत्नांचा
कुणी मागत असल्यास, मुक्त मनाने देतो
तो संपण्याऐवजी पुन्हा भरून वाहतो ...

मी संध्याकाळी एकरूप होऊनी
मी नदीकिनारी गुणगुणत असतो  गाणी
गाणे ऐकून माझे सूर्य गुलाबी होतो
भेटण्या मला वात लाटेला घेऊन येतो ...

मी मनात घेऊन स्वप्नांची शिदोरी
मी वाट आक्रमीत जातो पंढरपुरी
अन पाहतोच जेंव्हा विटेवरी पांडुरंगाला
तो क्षणात विठोबा अद्वैत साधत जातो ...

©भार्गव हिरवे



.



Wednesday, 20 September 2017

क्रांतीसमिधा

बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट मनात आहे, काहीतरी भन्नाट लिहायचं, लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. मनाला समाधान देणारं, उर्जा देणारं, अंधारातून तेजोमय प्रकाशाकडे घेऊन जाणारं, मनाला एकाच वेळी अस्वस्थ आणि शांत करणारं, एकाच वेळी विचारांचं काहूर आणि निरव भयावह शांततेतही मनाला ओढ लावणारं. त्या काहीतरीचा शोध लेखणी घेत होती, हात फुरफुरत होते. शब्द अव्यक्त स्वरूपात मनाच्या गाभाऱ्यात दडून बसले होते. ज्याप्रमाणे शिवशंकराने भागीरथीला आपल्या जटांत बांधून ठेवले होते अगदी त्याचप्रमाणे.

माझ्या मनाला याही गोष्टीचं मोठं कोडं वाटतं की, कोणता विचार कधी कुठे आणि कसा रुजतो ? एखाद्या विषयाची ओढ का वाटावी ? आपण खाऊन पिऊन सुखी असतांना, जगात पेटलेल्या संघर्षाची काडी इतकीही स्वतःला झळ पोचत नसतांना मनानी इतकं बेचैन का व्हावं ? राष्ट्र, धर्म, ध्वज ही कुणीही न सांगता आपली स्वत:ची ओळख कशी बनावी ? कोण गांधी ? कोण नेहरू ? कोण राजगुरू - भगतसिंह - सुखदेव - बटुकेश्वर दत्त - रामप्रसाद बिस्मिल - चंद्रशेखर आझाद ? कोण टिळक - आगरकर - सावरकर ? कोण तो अनंत कान्हेरे आणि कोण तो मदनलाल धिंग्रा ? पुस्तकातून यांच्या ओळखी झालेल्या. यांच्यापैकी कुणाचाही वैयक्तिक संबंध नसतांनाही आपण यांचे खरचं कुणीतरी आहोत असं मनातून का वाटावं ? पुण्याच्या रस्त्यावरून  गणेशखिंड भागातून जातांना का परत परत चाफेकर बंधू आठवावेत ? का फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीत फिरतांना मागून टिळक आवाज देतील का वाटावं ? का ? या एकाच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी घेऊन येत आहे क्रांतीसमिधा या लेखमालिकेतून काही ज्ञात- अज्ञात क्रांतिकारकांच्या गोष्टी ... 

- भार्गव हिरवे 

Tuesday, 19 September 2017

इच्छा ...

पहावा पदन्यास मोरांचा,
ऐकावी तान कोकिळेची
घ्यावा गंध मातीचा,
असावी झोळी शब्दांची

व्हावे फकीर कोठे मी,
व्हावे कोठे सन्यासी
नेसावी छाटी कोठे मी,
कुठे कफनीही नेसावी

मशिदीत आता मी,
माझी मान झुकवावी
देवालयात असतांना
प्रचिती समाधीची यावी

दिसावा पीर पैगंबर
दिसावा विष्णू शेषशायी
दिसावा रंग रक्ताचा
अन एकच हास्यमुद्राही

- भार्गव

Friday, 15 September 2017

झाले रिते आकाश सारे ...

झाले रिते आकाश सारे, गेल्या कुठे चांदण्या ?
शोधण्या चंद्र घरात बघता, त्या साडीवर दिसू लागल्या ...

काय अधिकार त्यांचा, बिलगल्या जाऊन तिला 
तक्रार घेऊन गोपी जणू, यशोदेकडे धावल्या ...

हाय आता काय ही वेळ यांनी आणली 
रुसल्या तिला मनवण्याच्या क्लुप्त्या कुणी सांगेल का ?

पुन्हा होऊन बाल मी, लटके जरा बोलेलही 
काय ती ललाट माझे, उचलुनी चुंबेल का ?

थांबा जरासे तुम्ही, बोलायचे आहे मला 
खबरदार ! जर याल घेऊन तक्रार येथे पुन्हा 

रागावलो ... आता जवळ माझ्या सख्या राहतील का ?
की पुन्हा आयुष्य माझे अंधारून येईल का ?

मजला हवेत सारेच भोवती, चंद्रही अन चांदण्याही
नावडते मज पौर्णिमा अन  नको मज अमावस्याही ...

- भार्गव हिरवे 

आयुष्य ...

खरंच सांगतो आयुष्य सोप्पं आहे
चॅलेंज घेऊन जगण्यात थ्रिल आहे

मुठीतुन वाळू सगळी निसटल्यावर
मूठ गच्च आवळण्यात जिद्द आहे

चेहऱ्यावरती नेहमी मंद स्मित असावं
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं स्वागत आहे

शांततेतही मन असंकाही रमून जावं
मग येणारा हुंकारही कविता आहे

©भार्गव हिरवे 

Thursday, 14 September 2017

नाते ...

व्योम चुम्बण्याला फांदी जशी निघाली 
जाणीवही मुळांची मुळांपरी रुजावी 

संस्कार खोल केले मातीने जयांवर
आपसूक नजर त्यांची मातीकडे वळावी 

शब्दन् शब्द व्हावा सरी पावसाच्या 
मातीतून सुगंधी कविता जशी फुलावी 

वाफाळल्या चहावर फुंकर घातल्यावर 
 क्षणभर ऐनकाची नजर धुंद व्हावी 

बहरून क्षण यावे, रोमांचही फुलावे 
लाजाळूपरी तरीही पापण्यांनी मिटावे 

नाते असे असावे, नाते कसे असावे 
नकळत  वेलीवर जसे प्राजक्ताने फुलावे

- भार्गव हिरवे 



 

 
  


  

Tuesday, 12 September 2017

कुजबुज ... बुजबुज ...

कुजणाऱ्यांनो बुजणाऱ्यांनो
का बरं कुजबुजता ?
आपल्या सडक्या विचारांची
घाण का पसरवता ?

ठरतो कसा कोणी देशद्रोही
वंदे मातरम न म्हटल्याने ?
अन कशी आजमावणार निष्ठा
वंदे मातरम म्हटल्याने ?

येतो भारीच पुळका यांना
समाजविघातक वृत्तीचा
घेतलाय काहींनी ठेका आता
समाजाच्या सुधारणेचा

दररोज शब्दबंबाळ भिंती
होतात निळ्या रंगाच्या
रंगांनाही असतो रंग
इथे प्रत्येक धर्माचा

तो अमक्या नि हा तमक्या
अन मी खमक्या जातीचा
येतो आता उबग यांच्या
स्वार्थलोलुप वृत्तीचा

बाटला ना रे धर्म माझा
त्याच्या झालेल्या स्पर्शाने
बाटवला मी कुलाचार त्यांचा
माझ्या अस्वच्छ स्पर्शाने

नीती नियम विचार सारे
अविचाराने सोडा रे
प्रार्थना आता करता रे कसली ?
धरा बिभत्सतेचा ठेका रे

नको वैचारिक गुलामगिरी
नको विचारधारा रे
करून टाकू राख तयांची
मानवतेच्या स्पर्शाने

वृथा नको हेटाळणीही
विज्ञानधिष्ठित ज्ञानाची
करा चिकित्सा धर्माचीही
आदरपूर्वक सन्माने

काल त्यांनी केला हल्ला
आमचा माणूस मेला रे
आपणही करून हल्ला
घेऊ त्याचा बदला रे

हळहळतो जीव माझा
जेंव्हा माणूस मरतो रे
विचारधारांचे लावून लोणी
स्मशानात उरते  राख रे

- भार्गव हिरवे

Monday, 11 September 2017

विलाप ...

नको मजला धर्म अन, नको मजला जातही
हिमालयाच्या हिमशिखरावर आक्रंदते का भारती

फेसाळला का सिंधू - सागर, फुरफुरल्या का मशाली 
जळणाऱ्या अग्निजिव्हा का इथे अश्रूत न्हाती 

या तरूंवर कोण पक्षी, मंजुळ स्वरे आरविती 
पैलतोगे काऊ जिथे देतसे पाहुण्यांची वर्दी 

का म्हणून एकमेका हिन सारे लेखति ?
माणसाने माणुसकीशी नाळ केंव्हा तोडली  ?

मीपणाच्या कुबड्याच मित्रा, जाती या अन धर्मही 
लडखडो वा धडपडो तरी मी वाट माझी चालली  

हीच माझी आज्ञा अन हीच अंतिम इच्छाही 
न द्या मला संस्कारशिक्षा, जळण्याची वा पुरण्याची

ती असावी पहाट सुंदर, इच्छा वसली मानसी 
दिसावेत या नभी निळसर, चंद्र- सूर्य संगती

राम- रहीम- बुद्ध यांची जिथे, एकमेकांत  वसती   
नजर करावी नजर प्रभो, हे पाहण्याची दिव्यदृष्टी

कित्येक इच्छा मनास माझ्या दिवसागणिक दंशती   
मी शोधतो स्वतःत शेवटी, भालचंद्र व्योमकेशी  

- भार्गव हिरवे 






  




Thursday, 7 September 2017

तुला कळणार नाही ... ८ सप्टेंबर २०१७

असं फार क्वचित होतं जेंव्हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्याबरोबर तो जाम आवडून जातो. तसचं काहीसं झालंय तुला कळणार नाही या चित्रपटाचं ट्रेलर पाहिल्यावर.

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय, स्वप्ना वाघमारे जोशी यांचं दिग्दर्शन, आणि नेहमी अभिनेत्याच्या भूमिकेतून वावरणारा स्वप्नील जोशी आणि टीम यांची  निर्मिती असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा असं वाटतंय.

राहुल आणि अंजलीची  केमिस्ट्री असलेला हा चित्रपट पहायला विसरू नका, ८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होतोय. प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या तक्रारी घेऊन येणारा हा चित्रपट देतो का त्या तक्रारींवरचा रामबाण उपाय ? बघूया थेट थेटरात ...




शेवटी माझं तसही लग्न झालेलं नाही त्यामुळे काहीही असलं तरी मला कळणार नाही.
मन:पूर्वक शुभेच्छा ... 

Wednesday, 6 September 2017

चित्रपट पहावा काढून / करून ... लग्न पहावे करून ...

जरा जास्तच लेट आहे पण अगदी थेट आहे ...


बऱ्याचदा कंटाळा आला, काही चांगलं पाहावंसं वाटलं की, माझे हात आपोआप YouTube वर जातात आणि विनासंकोच मी मराठी चित्रपट सर्च करून वाटेल तो चित्रपट अगदी त्याबद्दलच्या प्रतिक्रिया न वाचता पहातो कारण एकच, ते म्हणजे मराठी चित्रपट पाहिल्यावर आपण वेळ वाया घातला असं कधी वाटत नाही.  

कालसुद्धा तसंच झालं, कंटाळलो होतो, नेहमीप्रमाणे सर्च केलं.  'लग्न पाहावे करून' हे शिर्षक असलेला चित्रपट दिसला. त्यातल्या त्यात मुक्ता बर्वे, उमेश कामत, तेजश्री प्रधान, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखी स्टारकास्ट म्हटल्यावर चित्रपट उत्तम असणार याबाबत शंकाच उरली नव्हती. कारण, मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई, उमेश कामतचा टाईम प्लिज, तेजश्री प्रधानचा आत्ताच येऊन गेलेला TSKK , आणि सिद्धार्थचा क्लासमेट हे सगळे चित्रपट पाहून झालेले होते. यांच्या अदाकारीने यांची एक वेगळी इमेज तयार झाली होती. पण कधीकधी सगळे उत्तमातले उत्तम पदार्थ एकत्र करून बनवलेली डिश पण आवडत नाही तसंच या चित्रपटाचं झालं.

स्टारकास्ट उत्तम, अभिनयात सगळेच उजवे, पण एक झालं की, गोष्ट काळजाला भिडलीच नाही, सुरुवातीला मुक्ताला जाड्या आणि त्याच्या मशीनला उमेशच्या सांगण्यावरून उपदेशाचे डोस पाजताना दाखवलंय, त्यात एकमेकांशी भांडण्याव्यतिरिक्त ते दोघं काहीच करत नसतांना व्हिडीओ क्लिप वगैरे च ज्ञान उगीच त्या आदिती नावाच्या पात्राच्या तोंडात कोंबलंय. कॉफीशॉपमध्ये भांडणाऱ्या त्या जाड्याचा आणि पोरीचा रोल नेमका कळाला नाही, अगदी जिथं काहीच वर्कआउट होत नाहीये तिथे त्यांना कुठेतरी किल्ल्या देण्याच्या बहाण्याने दोन वाक्यात गुंडाळल्यासारखं वाटतंय. तो पहिल्यांदा म्हणून घाबरत आलेला मुलगा नंतर चित्रपटात कुठेच दिसला नाही.  शुभविवाह संस्थेतलं पहिलं लग्न दाखवतांना तेजश्री आणि सिद्धार्थ यांना स्वतंत्रपणे कथेत आणायला हवं होतं. ते न होताच त्यांना डायरेक्ट डार्करूममध्ये दाखवलं. मध्यरात्री मुक्ता तेजश्रीला लग्नाच्या पहिल्या रात्री फोन करते हे पाहून कल्पकतेची किव आली. पत्रिका जुळत नाही त्यामुळे होणारे वाद दाखवण्याच्या नादात त्या दोघांमधली केमिस्ट्री बिघडवली पण तीही इतकी धावती की अगदी काय काय दाखवू आणि काय काय नको अशी गडबड यातून झालेली दिसली. अगदी शेवटी सस्पेन्समध्ये ठेवलेलं आदिती टिळक उर्फ मुक्ताचं आयुष्यही चित्रपटाला अर्थ देऊ शकलं नाही. 

त्या भविष्य बघून, पत्रिका बघून लग्न जुळवणाऱ्या बाईच्या दुकानासमोर परत एकदा शुभविवाह चा लागलेला बोर्ड पाहायला आवडलं असतं पण तेही नाही. अगदी हीच संकल्पना दोन पात्र कमी करून दोघांवरचं चित्रित करता आली असती, कदाचित कथेला अजून चांगला न्याय देता आला असता असं वाटतं. 

- भार्गव हिरवे 


उत्सुर्त अनामिका ...१


प्रश्न ...


कैद ...


निसटला तो ...


Monday, 4 September 2017

कविता आणि बरंच काही ...


कविता आणि बरंच काही ...


कविता आणि बरंच काही ...


कविता आणि बरंच काही ...


आर्या ...

जळण्याचे वरदान घेऊन जळते आहे
चराचराला ज्योत प्रकाशित करते आहे

उलगडायला लागल्यात भावना हल्ली
व्यक्त अव्यक्ताचे कोडे मन सोडवते आहे

कैक रात्री उजळल्या आठवणीत तुझ्या
दिवस रात्रीची वाट पाहण्यात जातो आहे

रंगलेल्या तुझ्या मैफिलीला नाही सुगावा
गायलेल्या भावना तू माझ्याच आहेत

हृदयातील स्पंदने जेंव्हा शब्द होती
प्रत्येक श्वास अभिमंत्रित आर्या आहे

©भार्गव

सृजन ...

नाते तिचे नि त्याचे जणू बंध रेशमाचे
डोळ्यातल्या सरींना वेध पावसाचे ...

एकाच क्षणासाठी आतुर ही धरित्री
द्वैतातुनी फुलावे क्षण अद्वैताचे ...

सर्वदूर दरवळावा परिमल मिलनाचा
साजरे करू महोत्सव फुलणाऱ्या अंकुराचे ...

©भार्गव

स्टारडम ...

मागच्या काही महिन्यांपासून पुण्यात आलोय. पुण्यात आल्यावर आपण एका ऐतिहासिक नगरीत पाऊल ठेवतोय याची जाणीव माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाला होत असेल तर त्यात काही वावगं नाही असं मला वाटतं. पुण्यात येऊन जेंव्हा हिंजवडीसारख्या भागात रहायला आलो तेंव्हा आतोनात आनंद आणि दु:ख झालं. आनंद याचा की माझ्या घरातून दिसणारे डोंगर, हिरवळ पुण्यात दिसणं शक्य नाही आणि दु:ख याचं की ज्या पेठेतल्या पुणेकरांचे तिखट गोडवे मी ऐकलेले होते त्यांचे ते कौतुकाचे शब्द मला या भागात ऐकायला मिळणार नव्हते. पण शिकवणीच्या निमित्ताने का होईना आता मी पेठांच्या जवळ जातो. अगदी अस्सल नाही तरी काही प्रमाणात पुणेरी ठसका डेक्कन भागात भरतो. 



                          

हे सगळं याच्यासाठी सांगायचं की, डेक्कनला जातांना मला दररोज बालगंधर्व आणि संभाजी उद्यानचा परिसर लागतो आणि मी या परिसराच्या अगदी प्रेमात पडलोय. तिथे बसायला केलेली जागा, तिथली हिरवळ मला माझ्या हिंजवडीच्या घरातल्या इतकाच आनंद देते. इथून जातांना दररोज काही क्षण पावलांची गती मंद होते, कॉलेजचे ग्रुप, म्हातारे आजी-आजोबा, एखादा उनाड मित्रांचा समूह मस्ती करतांना, मुली खिदळतांना दिसतात, कुणी एखादा एखादं बेफाट पुस्तकं हातात घेऊन बसलेला असतो. कुणी राघू-मैनाच्या गप्पा करतांना दिसतं.

मग हे सगळं पहात असतांना उगीच एक विचार मनात येऊन जातो, आणि स्टारडम बद्दल असणारी ओढ किंवा आपणही काहीतरी भारी असावं, अगदी प्रसिद्ध (अर्थात सुप्रसिद्ध ) याबद्दलची ओढ कुठेतरी कमी व्हायला लागते. वाटतं की, आपण कदाचित जर फेमस असतो तर आपण आपल्या आयुष्यातून या छोट्या छोट्या गोष्टीतला किती आनंद हरवून बसलो असतो. कधी हे असं मनमोकळं जगताच आलं नसतं. वाटलं तिथे थांबा, ज्या ठिकाणी वाटलं तिथे पाणीपुरी खा, गाडीचा कंटाळा आला तर  पायीच चालत जा, जिथे पाय कुरकुर करायला लागतील तिथून जवळचा बसस्टॉप शोधा आणि परत आपल्या घरी , कुठली बंधनं नाहीत, अगदी स्वच्छंदीपणानी अगदी त्या बागेतल्या फुलपाखराप्रमाणे फिरायचं. अगदी झेडब्रिजवरच्या कावळ्यांची कावकाव पण गमतीदार वाटू लागते. ट्राफिक सिग्नल वरून रस्ता क्रॉस करतांना अर्ध्यातून सिग्नल सुटलं की दुसरी बाजू गाठायला होणारी धडपड ही या सुप्रसिद्ध कलाकारांच्या वाट्याला कुठे यायला. प्रसिद्ध होण्याआधी जगलेलं हे जग बऱ्याच जणांना परत खुणावत असेल नाही ? असं उगीच वाटायला लागतं. खरचं आपल्या देशात किंवा कुठेही या सुप्रसिद्ध कलाकारांना जर सामान्य माणसासारखं जगता आलं तर, अर्थात लोकांनी जगू दिलं तर कित्ती मज्जा येईल ?
माझ्यासारखा एखादा माणूस जसं एखादं गाणं गुणगुणत रस्त्यावरून फिरतो, तसचं उद्या शंकर महादेवन मूड मध्ये एखादी ओळ आपल्या स्वत:च्या आनंदासाठी गाऊन जाईल. आजूबाजूच्या मैत्रिणींच्या फार आग्रहावरून एखादी आर्या भाव खात एखादी ओळ गाऊन दाखवेल. एखादा अभिनय  उगीचच आपल्या केसांतून हात फिरवत आपल्या बाजूनी गेलेला असेल. दिलीप प्रभावळकरांसारखा दिग्गज नट कुठेतरी बागेत फिरतांना दिसेल. अगदी मनमोकळेपणानी. हे सगळं तितक्याच सहजपणे व्हायला हवं. एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मान देणं, त्यांच्या कलेचं कौतुक वाटणं त्यांच्याबद्दल प्रेम वाटणं हे स्वाभाविक आहे पण आपल्या प्रेमाच्या अतिरेकामुळे त्या कलाकारांना त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी.

बऱ्याच दिवसांपासून हा विषय लिहायचं मनात होतं आज मानसी परांजपेंची पोस्ट वाचली आणि सुचत गेलं ...

- भार्गव हिरवे

भूकंप

कुणीतरी ओरडलं ...
भूकंप... भूकंप... भूकंप...
ऐकूनच हादरली धरित्री
घाबरली, सैरभैर झाली
आपल्या पिल्लांना पंखाखाली घेणार्या
पक्ष्यांसारखी

करत होती अनाठायी प्रयत्न
धडपडत होती माणसाला कवेत घेण्यासाठी
वाचवू पाहात होती
तिच्या लेकरांनी वर्षानुवर्षे वेचून उभं केलेल
पत्त्यांच क्षणिक साम्राज्य
ईच्छा एकच होती ....
लेकरांना ईजा होऊ नये

शेवटी नियतीसमोर हतबल झाली
क्रौर्याच्या शृंखलात जायबंदी
घेऊन माणसांच कलेवर
दगडांच्या सचेतन ह्रदयावर
धाय मोकलून रड़ू लागली

पण अजून ...
दैव घाला घालतच होतं
आक्रोश कुणी ऐकलाच नाही

शेवटी अश्रू आटले ...
आणि परत एक ...
असंख्य माणसांच थडग झाल
निर्मनुष्य, नीरव, खडकाळ माळरान ...

©भार्गव हिरवे

YZ मराठी चित्रपट


मराठी चित्रपटांची कौतुकानी पाठ थोपटणं हे आता सुरु व्हायला हवं. तसं पाहिलं तर मराठी रसिक ते नेहमीच करतो यात वेगळ काही सांगायला नको. पण हिंदी चित्रपटातून कोणतीही कथा विकृत स्वरूपात मांडली जात असतांना संस्कृती आणि सामजिक मुल्यांच भान राखत तरुणांना आवडेल असा एखादा चित्रपट तयार करणं हे फ़क्त मराठी चित्रपट सृष्टीच करू शकते. हे परत एकदा yz च्या टीम नी दाखवून दिलं.

चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार साईड रोलमधे ( ज्यांची नावं लोकांच्या तोंडात नेहमी असतात असे सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे ) आहेत. पण मास्तरांची आणि बत्तीस नावाच्या त्यांच्या विद्यार्थ्याची भूमिका अफलातून आहे. त्यांची मैत्री, त्यातून घडणारे बदल. वाईच्या कुलकर्णी सरांची नंतर त्यांच्या मावस बहिणीच्या मैत्रिणीशी अंतरा नावाच्या पात्राशी झालेली ओळख, त्यांची केमिस्ट्री, आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीची एक्सीडेंटली झालेली भेट. त्यातून शेवटी तीच लग्न लाऊन देण. आणि शेवटी स्वत:च्या निर्णयांवर ठाम रहात लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांना जगण्यासाठी मास्तर निघतात. या ठिकाणी शेवट.
अडीच तास माणूस पुर्णवेळ चित्रपटात हरवून जातो. यात कुठेही नात्यांचा अवमान, आपली मर्यादा सोडून केलेलं वर्तन, विद्यार्थी दोस्तासोबत बिड्या शेजावित बसलेले मास्तर दाखवलेले नाहित. कोणत्याच प्रकारचं गलिच्छ संगीत चित्रपटातून दिसत नाही.
अंतरा या पात्रानी मास्तरांना दिलेलं प्रेमपत्र प्रेक्षकांनी वाचल्यावर एक गोष्ट कळते ती म्हणजे चित्रपटाचा निर्मात्यानी आणि लेखकानी केलेला आभ्यास.उत्तम दिग्दर्शनाचा प्रत्यय पण जाणत्या माणसाला आल्यावाचून रहाणार नाही. प्रत्येकानी जरुर पहावा असा चित्रपट.

©भार्गव हिरवे



पुतळे

ऊन, पाऊस, वारा अन गारा
त्यावर धुळीची शाल पांघरून
प्रत्येक चौकाचौकातून उभं राहून
आता पाय थकलेत आमचे ...

आठवण मनात नाही,
तुम्ही आम्हाला मानत नाही
राजकारणाच्या पटांवरची
मोहरी झालोय आम्ही आता

एकमेकांच्या विचारांचा
कधी परस्पर विरोधी मतं असूनही
माणूस म्हणून आदर ठेवणारे
आम्ही ब्रॉन्झच्या पुतळ्यातुन
आता एकमेकांवर वार करतोय

काय शक्कल लढवून
माणसा माणसात लावता भांडण
आणि सामान्य माणूसही झालाय मुर्ख
न वाचता एकही शब्द ...
पुतळ्यांची भाषा फक्त जाणणाऱ्या
धूर्त कोल्ह्यांवर ठेवतोय आंधळा विश्वास ...


© भार्गव हिरवे

स्वप्नातली हाक ...

काळजाच्या एका कोपऱ्यातून
एक हाक ऐकू आली

मनातली शांतता भंग करत
विचारांचे काहूर उठवून गेली

चिडलेल्या मध माश्यांप्रमाणे
हृदयात डंख मारत गेली

भयंकर काळ कुटासारखी
नसानसात झोंबत गेली

स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवत
मला जिवंतपणे मारत गेली

 स्वतःची आठवण देऊन
माझी झोप उडवून गेली

©भार्गव हिरवे

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ...


आज ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ च्या गजरात सर्वांनी गणपती बाप्पाला प्रेमाचा निरोप दिला. खरं पहिलं तर निरोप हाच वेदनादायी असतो मग तो कोणालाही असो देवाला किंवा माणसाला. अगदी महिनाभर आपल्या घरी राहिलेल्या पाहुण्याला सुद्धा टाटा म्हणताना आपले डोळे पाणावतात मग भलेही तो आपल्याला हवा असो अथवा नसो कारण आपल्याला त्या व्यक्तीची सवय झालेली असते. त्या सोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण हा अद्वितीय असतो.

हा तर माझ्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा प्रसंग होता. डोळे पाणावले होते. १० दिवस ज्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला तेवढाच उत्साह कायम ठेवत निरोप देणं कठिण झाल होत, पण तरीही प्रेमभराने निरोप देण्यासाठी आणि विविध देखावे, बाप्पाच्या मुर्तिमधून शिल्पकारानी दाखवलेल्या भावमुद्रा पहायला माझ्या मित्रांसोबत मी मिरवणुकीत गेलो.

बाप्पाला निरोप देण्यासाठी अथांग जनसागर त्या मिरवणुकीत आला होता. सारेच बेफामपणे नाचत होते. नंतर त्या मिरवणुकिचे खरे स्वरुप डोळ्यासमोर आले. नाचत असताना जाणवलं की गणपती बाप्पाच्या जयघोषाची ही नशा नाही तर चक्क दारू पिउन झींगणारी ही युवा पीढ़ी आहे. जिला फ़क्त मनोरंजनच हव आहे, बीभत्स नाच, अश्लील शिव्यांचा स्वैर वापर, सारच मन उद्विग्न करून टाकणार होत. असलेला उत्साह क्षणात नाहीसा झाला. एक प्रकारची किळस बसली मनात त्या मिरवणुकीबद्दल.
मनापासून विघ्नहर्त्याला विचारावस वाटत की हे सर्व कस सहन करतोस, ‘तुझ्या नावातली शक्ती संपली का? लोकांना तुझ्या विसर्जनाच्या मिरवणुकित ठेका धरण्यासाठी मद्यप्राशन कराव लागाव यापेक्षा दुर्भाग्य ते कोणत ? तू बुद्धीचा देवता मग बुद्धिभ्रष्ट लोकांना थोड़ी बुद्धि, सामाजिक जाणीव का करून देत नाहीस ?’

सामाजीक एकतेसाठी लोक्मान्यानी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला पण आता ती एकता दिसते ती फ़क्त तुझ्या नावानी वर्गणी जमा करण्यात, ती खर्च होते व्यसनात. त्या एकतेचा वापर होतो तो दोन गटात मारामारी करण्यात. इथे राजकीय नेत्यांचे जयजयकार चालतात तुझ्या नावापेक्षा मोठ्या आवाजात अगदी लाउड स्पीकर वरून. सगळच विचित्र.

जनजागरण करणे हा या उत्सवामागे असलेला अजुन एक प्रमुख उद्देश. तो तर कुठे दिसतच नाही. सकाळी जिथे कानावर ‘ उठा उठा हो सकलिक ‘ चे सुर पडायचे तिथे आता वजतायेत सारखे सैराट च्या तालावर झिंगाट सारखे चित्रपटातले आइटम सोंग्स.
मान्य आहे काळ बदललाय, माणूस बदललाय पण जी नितिमुल्य माणसाला उदात्तपणे जीवन जगायला शिकवतात ती तीच आहेत जुनी जुनी जुनी. ज्या व्यक्ति समाजासाठी आदर्श्य बनतात त्या फ़क्त जुन्यातल चांगल टिकवून ठेवतात आणि नव्यातल चांगल आत्मसात करतात म्हणून .....!!!

काही गणेश मंडळ सामाजीक जगृतिसठी देखावे करतात पण त्यातून विषय मांडले जातात ते म्हणजे शेतकर्यांची आत्महत्या, हुंडाबळीसारखे, पण त्या सोबतच गरज आहे ती त्याचे निवारण करण्यासाठी लागणार्या उपायांची तरच आपण खर्या अर्थाने म्हणु शकू की आम्ही सामजिक जगृतीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे. तरीही यावर्षी एक गोष्ट कौतुकास्पद वाटली ती म्हणजे एका गणेश मंडळाने कारगिल च्या युद्धावर माहितीपर देखावा सादर केला. जो येणार्या पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त करतो, कारण ' जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ' त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण हीच राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी असते . 

ही पोस्ट दोन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये लिहिलेली होती, दुर्दैव हे की आजही हीच परिस्थिती पहातोय. बाप्पा बदलव रे बाबा हे सगळं.

©भार्गव हिरवे

Popular Posts